नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) राज्यातील नियमांचे उल्लंघन करणारे किंबा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांवर कारवाई करते. मागील महिन्यात आरबीआयने एचडीएफसीसह बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर कारवाई केली होती. त्यानंतर आता आणखी ३ मोठ्या बँकांवर आरबीआयने धडक कारवाई केली (RBI Action) आहे. मात्र यामुळे खातेधारकांच्या ठेवींवर काही परिणाम तर होणार नाही? असा प्रश्न सामान्य खातेधारकांना पडत आहे.
आरबीआयने कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आरबीआयने तिन्ही बँकांवर ही कारवाई करत असतानाच त्याची सर्वतोपरि जबाबदारी बँकांची असून बँकांच्या खातेधारकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही असे म्हटले आहे.
आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, कोटक महिंद्रा बँकेकडून (Kotak Mahindra Bank) ‘कर्ज वितरणासाठी कर्ज प्रणाली’चे निर्देश तसंच ‘कर्ज आणि आगाऊ वैधानिक’, इतर निर्बंधांसंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यामुळं बँकेला ६१.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, ‘बँकांमधील ग्राहक सेवा’ संदर्भात आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याने पंजाब नॅशनल बँकेवर (PNB) २९.६ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच केवायसी (Know Your Customer – KYC) संदर्भातील काही सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First Bank) आरबीआयनं ३८.६ लाखांचा दंड ठोठावला आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याची बाब लक्षात येताच आरबीआय बँकांवर कारवाईचा बडगा उगारते. मात्र यावेळी खातेधारकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षतासुद्धा बँकेकडून घेण्यात येते.