तक्रारीकडे महसुल व वनविभागाचे दुर्लक्ष
मंडणगड l प्रतिनिधी : तालुक्यातील पंदेरी भट्टीवाडी येथे सावित्री खाडीपात्रातील कांदळवन क्षेत्रातील संरक्षीत झांडाची मोठी तोड करुन जमीनीचे सपाटीकरण केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
कांदळवन क्षेत्रातील खाजगी मालकीच्या जमीनीचे क्षेत्रात कांदळवनाचे नैर्सगीक पध्दतीने अतिक्रमण झालेले असल्यास शेतीचे कामांचे प्रयोजनाने ती जमीन नव्याने विकसीत करण्यासाठी प्रातांच्या पुर्व परवानगीने केवळ शेती कारणांसाठी ती विकसीत करण्याची परवानगी मिळत असताना व तशी परवानगी घेणे जमीन मालकांना बंधनकारक असताना मंडणगड तालुक्यात सावित्री नदीच्या किनाऱ्यावर असेलेल्या कांदळवनावर वाणिज्य कारणासाठी वापर करण्यासाठी अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी पुढे येत आहेत. नुकतेच पंदेरी भट्टीवाडी येथे खाडी पात्रातील कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड करुन जमीनीचा भराव करण्यात आला आहे. याशिवाय सावित्री खाडीपात्रात पाण्यामध्ये पक्के बांधकाम करण्यात आले आहे. ते कशासाठी करण्यात आले आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या विषयी महसुल व वनविभागाकडे तोड व जमीन अतिक्रमाचे विरोधात तक्रारी होऊन सुध्दा यंत्रणेने बघ्याची भूमिका घेतली आहे व दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवून या संदर्भात कारवाई करण्याकरिता टाळाटाळ करीत आहेत व आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असल्याने यंत्रणा कोणत्या कारणाने गप्प आहे असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.